"तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय उघडेल!"
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'गोल्डमन सॅक्स'च्या मुंबई येथील नवीन कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले.
गोल्डमन सॅक्सच्या नव्या कार्यालयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उभारले जाणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करणारी आहे.
खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारली जात असून, तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय तसेच संशोधनासाठी आवश्यक सुविधा असलेले ‘इनोवेशन हब’ उभारण्यात येणार आहेत. येथे क्वांटम कम्प्युटिंग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संशोधनास चालना दिली जाणार आहे.
तिसऱ्या मुंबईची सध्याच्या मुंबईसोबतची कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतू आणि काम सुरू असलेला वरळी-शिवडी लिंक रोड यामुळे या नव्या क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतूनच उत्तम विकास साधता येतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या शासन स्तरावरून जलदगतीने मिळतील. तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र हे गुंतवणूक स्नेही राज्य आहे. 'इज ऑफ डुईंग बिजनेस' साठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. काही अडचणी आल्यास, त्या तत्काळ सोडवल्या जात आहेत. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी गोल्डमन सॅक्सचे आशिया पॅसिफिकचे अध्यक्ष केविन स्नेडर, गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी व इतर मान्यवर उपस्थित होते.