छप्पन भोग का?
अनेक भक्तांना माहिती आहे की, जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाला ५६ प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात. पण हे नेमके ५६च का? यामागे एक अद्भुत पौराणिक कथा आहे.
पुराणकथेनुसार, ब्रजवासी लोक एकदा पावसाच्या देवतेला म्हणजेच इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्याची तयारी करत होते. नंदबाबांनी लहान कृष्णाला हे कारण सांगितले. त्यावर कृष्णाने सांगितले की, पाऊस देणाऱ्या इंद्राऐवजी त्यांनी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, कारण तोच त्यांना फळे, भाज्या आणि गुरांसाठी चारा पुरवतो.
ब्रजवासीयांनी कृष्णाचा सल्ला मानून इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा केली. यामुळे रुष्ट होऊन इंद्राने मुसळधार पाऊस पाडला आणि ब्रजभूमीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण केली. गावकऱ्यांना आणि जनावरांना वाचवण्यासाठी कृष्णाने आपल्या लहानशा बोटावर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला आणि सात दिवस-सात रात्री तो धरून ठेवला.
या काळात त्यांनी अन्नाचा एक घासही घेतला नाही. परंपरेनुसार, यशोदा माई कृष्णाला दिवसातून आठ वेळा जेवण घालायची. त्यामुळे सात दिवस उपाशी राहिल्याने, गावकऱ्यांनी आणि यशोदामाईंनी एकूण ५६ पदार्थ (७ दिवस × ८ वेळा) तयार करून श्रीकृष्णाला अर्पण केले. हीच परंपरा ‘छप्पन भोग’ म्हणून आजतागायत जन्माष्टमीच्या दिवशी पाळली जाते.
छप्पन भोगात काय असते?
छप्पन भोगात गोड, तिखट, फळे, धान्य, पेये आणि दूध-तूपावर आधारित पदार्थांचा समावेश असतो. यात माखन, मिश्री, पेढा, लाडू, रबडी, पुरी, कचोरी, हलवा, खिचडी, हंगामी फळे, थंड पेये असे अनेक पदार्थ असतात. प्रत्येक पदार्थ भक्तीभावाने तयार केला जातो.
अस्वीकरण: वरील माहिती ही पारंपरिक श्रद्धा आणि धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. याची सत्यता तपासलेली नाही.