कधी कधी आयुष्यात असं घडतं की, आपण कुणालाही दुखावलेलं नसतं, कुणाचं वाईटही केलेलं नसतं, तरीही शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते. चुकी दुसऱ्याची असते, परंतु दोषारोप मात्र आपल्यावर होतो. आणि जास्त त्रासदायक तेव्हा वाटतं, जेव्हा ज्याच्यामुळे आपण त्रास सहन करतो, त्यालाच लोक समजून घेतात, समजावतात, त्याच्यावर कोणीही एक शब्दसुद्धा काढत नाही. उलट आपल्यालाच सारखं दाखवून दिलं जातं की, "तू चुकीचाच आहेस!"
या प्रकारात आपल्यातल्या समजूतदारपणाचा गैरफायदा घेतला जातो. ज्या व्यक्ती शांत राहते, समजून घेते, प्रतिक्रिया न देता पुढे जाते — तिच्यावरच जास्त आरोप केले जातात. कारण लोकांना माहित असतं, ती व्यक्ती काहीही बोलणार नाही, आरडाओरडा करणार नाही.
पण विचार करा — ही समजूतदार व्यक्ती खरंच दोषी आहे का? की फक्त शांत राहिल्यामुळे, संयम ठेवला म्हणून तिला ‘दोषी’ समजलं जातंय?
दोष नसताना जर कुणी शिक्षा भोगत असेल, तर हे फक्त अन्यायकारक नाही, तर ते मानसिकदृष्ट्या खूप तोडणारं असतं. एखाद्या क्षणी वाटतं, की शांत राहणं, समजून घेणं, हेच चुकलं का? आपण समोरच्याला सावरलं, समजावलं, पण आज आपल्यालाच 'खरं' ठरवून दोष दिला जातोय.
या परिस्थितीत समोरच्याने एक क्षण थांबून विचार करायला हवा – "जो शांत आहे, तोच चुकीचा असेल असं का समजतो मी?"
कोणावरही आरोप करण्याआधी, जो काहीही बोलत नाही त्याच्यावरच बोट ठेवण्याआधी, खरं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
कोणतंही नातं एकतर्फी समजुतीवर चालू शकत नाही. जेव्हा एक व्यक्ती सतत झुकते, समजून घेते, तेव्हा दुसऱ्यानेही कधी त्याचं ऐकायला हवं, त्याच्या बाजूने विचार करायला हवा. कारण शांततेमुळे माणूस दुर्लक्षित होत जातो, पण त्याचं मौन अनेक गोष्टी सांगत असतं – ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे.
ज्याची चूक आहे त्याला सांगा — आणि ज्याची नाही, त्याला दोष देऊ नका.
शांत राहणं म्हणजे चूक मानणं नव्हे, आणि ओरडणं म्हणजे खरं असणं नव्हे.
मौनाचाही आवाज असतो — फक्त ऐकणं शिकलं पाहिजे.
✦ टीप:
हा लेख कुणावर वैयक्तिक टीका करण्यासाठी नसून, नात्यांमधील समजूत, संयम आणि न्याय या भावनांबद्दल सजगतेने विचार करण्यासाठी आहे. समोरचा माणूस शांत आहे म्हणजे तो दुर्बल आहे, असं समजणं चुकीचं आहे.