मुंबई : विराट कोहली कसोटी निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, माजी कर्णधाराचा दावा
विराट कोहली याने 12 मे रोजी सोशल मीडियावरुन पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. मात्र विराट हा निर्णय बदलू शकतो, असा दावा माजी कर्णधाराने केला आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने अवघ्या काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराटने एकाएकी निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा झटका लागला. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने मोठा दावा केला आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, असं क्लार्कने म्हटलं आहे.
मायकल क्लार्क काय म्हणाला?
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका 0-5 अशा एकतर्फी फरकाने गमावली तर विराट निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो. विराट टेस्ट क्रिकेटवर फार प्रेम करतो. तसेच विराटचं कसोटी क्रिकेटप्रती असलेलं समर्पण हे अद्भुत आहे. तसेच विराट आणि रोहित शर्मा या दोघांशिवायही भारतीय संघ चांगला आहे. या दोघांशिवायही टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जिंकू शकते, असंही क्लार्कने म्हटलं.
कर्णधार रोहित आणि विराट या दोघांनी अवघ्या काही दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. विराट आणि रोहित या दोघांनी गेल्या दशकापासून कसोटी क्रिकेटमध्ये योगदान दिलं. दोघेही कसोटी संघाचे प्रमुख खेळाडू होते. तसेच विराट आणि रोहित दोघांनीही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2024 साली टी 20I क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता विराट आणि रोहित दोघेही फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत.