विकासाच्या प्रक्रियेत गावांकडेही लक्ष देण्याची गरज : अमितकुमार नाफडे 

विकासाच्या प्रक्रियेत गावांकडेही लक्ष देण्याची गरज : अमितकुमार नाफडे 
  • Positive News
  • मे 8 2026

Share on  

विकासाच्या प्रक्रियेत गावांकडेही लक्ष देण्याची गरज : अमितकुमार नाफडे 

वसंत व्याख्यानमालेत मांडला 'कृषी विकास'चा प्रवास 

नाशिक : कोविड काळात बळीराजाने जगाला तारले. आपल्या विकासाचा खरा जीडीपी हा कृषी आणि गावांमध्येच आहे. म्हणुनच ग्रामीण भारत थांबला तर देश थांबेल. म्हणुन शहरांप्रमाणेच गावांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारी मजूर टंचाई या समस्यांनी ग्रामीण भारत होरपळत आहे. त्यातुन बळीराजाला बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.असे प्रतिपादन बुलढाणा येथील कृषी विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार नाफडे  यांनी येथे केले.

गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी श्री. नाफडे यांनी अँड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यानात सातवे विचारपुष्प गुंफले. त्यावेळी ते 'ग्रामीण भारत घडविताना : गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला निवृत्त शिक्षक नथुजी देवरे आणि हिरालालसिंह परदेशी यांच्या हस्ते अँड. उत्तमराव ढिकले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ सभासद कांतीलाल ताथेड, संगीता बाफणा यांनी श्री. व सौ.  नाफडे यांचे स्वागत केले.  दरम्यान,  व्याख्यानस्थळी कु. पलक आसिफ तांबोळी यांच्या चित्रांचे  प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला रसिक नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. कृषी विकासचा प्रयत्न म्हणजे गावं बदलण्याचा प्रवास असल्याचे सांगत त्यांनी 2020 मधील कोविड काळापासूनच्या या प्रवासाचा आढावा घेतला. आज अत्यंत विदारक परिस्थिती असल्याचे नमुद करून ते म्हणाले की, आपण जे अन्न खातो त्यावर चांगले संस्कार व्हायला हवे असे आपण सहज म्हणतो, परंतु हे अन्न पिकविणारा बळीराजाच समाधानी नसेल तर अन्न शिजवताना केल्या जाणाऱ्या संस्कारांचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आर्थिक दारिद्र्याशी झगडणाऱ्या ग्रामीण व्यवस्थेची वस्तुस्थिती मांडली. या माध्यमातून त्यांनी कृषी विकास संस्थेने पानलोट क्षेत्रात, मिश्र पिक, शाश्वत शेती, माती परीक्षण, उत्पादकता वाढ, जमिनीचे पुनरुज्जीवन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन, मत्स्य पालन आदी जोडधंदे आदी सुरू करून नवीन संधी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बायोगॅसचे प्रकल्प उभे राहात आहेत. यांत्रिकीकारणावर भर दिला जात आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहत आहेत. हे चांगले चित्र आहे. यातून 2047 पर्यंत 30 लाख शेतकरी कुटुंबांचा विकास करण्याचे स्वप्न कृषी विकास व आमच्या सहकारी संस्था बाळगून असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.
---
*सर्वकालिन सदाबहार गाण्यांची मेजवानी*
व्याख्यानानंतर सुरभी गौड प्रस्तुत 'एव्हरग्रीन हिटस्' हा सर्वकालिन सदाबहार हिंदी गितांचा रंगतदार कार्यक्रम झाला. यामध्ये सुरभी गौड- सूर्यवंशी व सहगायिका  दीपा चंदे, शिल्पा छाजेड, डॉ. सुचेता वलसंगकर, पायल सावजी यांनी सुमधुर आवाजात गाणी सादर केली. त्यांना अमोल पालेकर, जितेंद्र सोनवणे, शुभम जाधव व रोहित कटारे यांनी संगीतसाथ केली. अत्यंत लोकप्रिय व कर्णमधूर गीतांच्या या सादरीकरणास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
---
*आजचे (दि. 8) व्याख्यान*
1) वक्ते : अमेरीकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रा. समीर मित्रगोत्री
विषय : भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास 
2) मयुर- विशाल प्रस्तुत 'हिटस् ऑफ 90'ज
3) रोहिणी मैंद यांचे चित्रप्रदर्शन.

संबंधित बातम्या