नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'मंथन4युवा' समारोप कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये चर्चा करून चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर 'मंथन4युवा' या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देश यासाठी युवकांना शपथ आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25,000 पेक्षा जास्त युवक व युवती सहभागी झाले होते.
महाराष्ट्राची परंपरा असलेल्या विविध ढोल ताशा पथकांतील 4100 ढोल-ताशा वादकांनी एकत्रितपणे भव्य वादन सादर करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये विक्रम नोंदविला आहे. तसेच आधार नोंद असलेल्या 585 ध्वजधारकांच्या या उपक्रमामुळे जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वविक्रम केल्याबद्दल या संपूर्ण चमुचे अभिनंदन केले.
25,000 पेक्षा जास्त युवकांच्या साक्षीने हा उपक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजची युवा पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या कौशल्याने नावलौकिक मिळवीत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक सहभाग लाभलेल्या ध्वजधारकांच्या समावेशाबद्दल विश्वविक्रमामध्ये नोंद झाली असून यापूर्वी 260 ध्वज धारकांचा समावेश असलेला विक्रम आज मोडीत निघाला आहे.
सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिद्धिमा पाठक यांनी युवकांचे आयकॉन असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, 'कॉमनवेल्थ गेम्स 2026' मधील सुवर्णपदक विजेते पॅरा-ॲथलिट दिलीप गावित, जेनेरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे, गो झीरोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शाह यांच्या सोबत संवाद साधताना विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रेरणा व अनुभव युवकांसमोर शेअर केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधानामुळेच लोकशाही प्रगल्भ झाली आहे. आपल्या लोकशाहीमुळेच मला नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्टअप संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, युवकांना शासनाची संपूर्ण मदत करण्याचे धोरण असून स्टार्टअपसाठी इकोसिस्टीम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणामध्ये युवकांना 100 % मदत करण्याचा उद्देश्य असल्याने युवकांसोबत चर्चा करून आणखी चांगली पॉलिसी तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळवता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून निश्चित धोरण ठरविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
'मंथन4युवा' या उपक्रमांतर्गत 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील आयकॉन म्हणून ओळख असलेल्या युवक व युवतींचा गौरव करून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती देण्यात आली. 'नशा मुक्त भारत' या अंतर्गत युवकांना नशा मुक्तीची शपथ देण्यात आली. यामध्ये अमली पदार्थ मुक्त जीवनशैली या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यासोबतच अमली पदार्थांचा वापर अथवा विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही तसेच अमली पदार्थ मुक्त युवा पिढी घडविण्यासाठी सक्रिय सहभाग याबद्दल युवकांना नागपुरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शपथ दिली.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक विष्णु चांगदे, रितेश गावंडे, विविध क्षेत्रातील युथ आयकॉन्स व हजारो युवक-युवती उपस्थित होते.