राज्यात पावसाची स्थिती, पीकपाणी व धरणसाठ्याचा मंत्रिमंडळात आढावा

राज्यात पावसाची स्थिती, पीकपाणी व धरणसाठ्याचा मंत्रिमंडळात आढावा
  • Positive News
  • जून 10 2025

Share on  

राज्यात पावसाची स्थिती, पीकपाणी व धरणसाठ्याचा मंत्रिमंडळात आढावा

        मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाची परिस्थिती, पीकपाणी, खत व बियाण्यांचा पुरवठा आणि धरणांतील जलसाठ्याचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागाचे प्रधान सचिव यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले की, राज्यातील बहुतेक भागांमध्ये 15 जूननंतर पावसाचे सक्रिय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला.

राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी, बारा जिल्ह्यांमध्ये 25 ते 50 %, चार जिल्ह्यांत 50 ते 75 %, तर एका जिल्ह्यात 100 %हून अधिक पाऊस झाल्याचे निदर्शनास आले. खत आणि बियाण्यांचा पुरवठा बहुतांश भागांमध्ये सुरळीत असून, साठाही समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली.

वेधशाळेच्या संचालक यांनी आगामी पावसाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 12 ते 15 जून दरम्यान कर्नाटकात, तर 13 ते 15 जून दरम्यान कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तसेच काही भागांत अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही 12 ते 14 जून दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, विजांच्या गडगडाटात सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. जायकवाडी, कोयना, उजनी, भातसा आणि धामणीसह प्रमुख धरणांतील साठा गतवर्षीच्या तुलनेत चांगला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आगामी कृषी हंगामासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध राहील, अशी माहिती देण्यात आली.
 

संबंधित बातम्या