स्मार्ट वीज मीटरमुळे अचूक बिलिंग, ऐच्छिक पर्याय आणि सौर वापरावर 10% सवलत!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत राज्यातील ग्राहकांसाठी स्मार्ट वीज मीटर लावण्याच्या निर्णयाची माहिती दिली.
राज्यात वीज वितरण अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याअंतर्गत 27,826 फिडर मीटर आणि 38 लाख ग्राहक मीटर आधीच बसवण्यात आले आहेत. या मीटरद्वारे सौर तासांमध्ये वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 10% सवलत मिळत आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हे मीटर बसवणे सक्तीचे नसून, ग्राहकांनी ऐच्छिकरित्या त्याचा लाभ घ्यावा. स्मार्ट मीटरमुळे प्रत्येक युनिटची मोजणी स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने देयकात अनावश्यक वाढ होणार नाही. देशातील जवळपास सर्वच राज्य स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून केंद्र सरकारकडून या योजनेसाठी ₹29,000 कोटींचा निधी मिळाला असून, निविदा प्रक्रियेनंतर 4 कंपन्यांना काम देण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये वीजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत, हेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोळीवाडे व वनजमिनीवरील ग्राहकांनाही वीजपुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन योजना तयार केली जाईल आणि ती न्यायालयासमोर सादर केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या मुद्यावर विधान परिषदेचे सदस्य आ. मिलिंद नार्वेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.